निद्रानाश - मधुमेहास आमत्रंण



निरोगी आरोग्यासाठी किमान ७ ते ८ तास झोप अत्यावश्यक असते. परंतु, बदलत्या जीवनशैलीमुळे, कामाच्या स्वरुपामुळे, स्पर्धेमुळे शरीराला पुरेशी झोप मिळणे दुरापास्त होत चालले आहे. त्यात टेलीव्हिजन, इंटरनेट आणि इतर मनोरंजनाची साधने अजुनच भर घालत आहेत.
आता तुम्ही विचार करत असाल की, मधुमेह आणि निद्राविकाराचा संबंध काय? खरंतर, निद्राविकारामुळे मधुमेह होण्याची शक्यता बळावते आणि मधुमेहामुळे निद्रेवर परिणाम होतो.
अमेरिकन डायबीटीस असोसिएशनच्या अहावालानुसार, ५ तासापेक्षा कमी झोप घेणा-या व्यक्तींना डायबीटीस होण्याचा धोका जास्त असतो. नविन संशोधनानुसार निद्रानाशाचा त्रास असणा-या ४० वर्षाखालील व्यक्तीला टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. २८,००० व्यक्तींवर करण्यात आलेल्य संशोधनानुसार हा निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

कमी झोप - मधुमेहाचे मुख्य कारण
रात्री उशिरा झोपणं, रात्रपाळी करणं किंवा इतर काही कारणांमुळे पुरेशी झोप होत नसेल, तर भविष्यात मधुमेह होण्याचा धोका वाढतो. कमी झोपेमुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावांमुळे इन्शुलिनचे कार्य बिघडते आणि अशा लोकांना मधुमेह होण्याचा मोठा धोका असतो. नियमित सहा ते आठ तासांची झोप ही सगळ्यांसाठी फार आवश्यक अशी गोष्ट आहे. त्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या हार्मोन्सचा समतोल राखला जाऊन जीवनपद्धतीशी निगडित बरेच विकार टाळता येऊ शकतात.
पुरेशी झोप न झाल्यामुळे शरीरावर चरबी वेगाने जमा होऊ लागते. पचनशक्तीवर विपरीत परिणाम दिसतो. अपचन, आम्लपित्त, गॅसेस, मलावरोध, त्वचा काळी व रुक्ष होणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, केस गळणे, त्वचारोग इत्यादी आजार होतात. याचेच रूपांतर पुढे मधुमेह, लठ्ठपणा, थायरॉईड, हृदयविकार, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांमध्ये होताना दिसते.

मधुमेहामुळे झोपेची कमतरता
अनियंत्रित मधुमेहामुळे रूग्णाच्या झोपवर परिणाम होऊन निद्रानाश संभवतो. रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे रूग्णांना रात्री किमान तीन ते चार वेळा लघवीसाठी उठावे लागते. त्यामुळे रात्री कमी आराम मिळतो आणि या रुग्णांना दिवसभर थकवा वाटणं, वारंवार डोकं दुखणं, हातपाय दुखणं, पित्ताचा त्रास होणं इत्यादी व्याधींना सुरुवात होते. हे परिणाम बराच काळ चालू राहिले, तर मानसिक आजारांनाही सुरुवात होऊ शकते.

आयुर्वेद व निद्रनाश
आयुर्वेदानुसार रात्री कमी किंवा पुरेशी झोप न झाल्यामुळे पित्त व वात दोष वाढतो. यांचा पचनसंस्थेवर परिणाम होऊन, अपचन, आम्लपित्त, अजीर्णासारखे आजार होतात. या अम्लपित्तादी आजारांमुळे हृदयावर अतिरिक्त तणाव येऊन रक्तदाब व रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. रक्तातील उष्णता वाढल्यामुळे त्वचा रोग उत्पन्न होण्याची शक्यता वाढते, तसेच शरीराचे पोषण मंदावते, शारीरिक व मानसिक बल कमी होते.

आयुर्वेदिय उपचार
मधुमेहामुळे निद्रानाश होत असेल तर मधुमेहावर वेळेत आणि लवकर उपचार करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी आयुर्वेदातील पंचकर्म व औषधी उपचार अतिशय गुणकारी सिध्द होतात. यामध्ये शिरोधारा, शिरोबस्ति, नस्य, बस्ति, स्नेहन-स्वेदन इत्यादी पंचकर्माची योजना करता येते. केवळ झोपेच्या गोळ्या घेऊन काम भागत नाही. कुठल्या कारणांमुळे शरीराचे जैविक घड्याळ बिघडले आहे, हे पाहणे गरजेचे ठरते. जेणेकरून आयुर्वेदीय उपचारांद्वारे रूग्ण लवकर बरा होईल.


डॉ. सचिन गायकवाड - पाटील
(M.D.), आयुर्वेद -पुणे  
श्री विश्वांकूर आयुर्वेद 
पूणे - औरंगाबाद 
संपर्क:- 8237523722
   हेल्प लाइन नंबर:- 8275183419


Comments

Popular posts from this blog

पाठीच्या मनक्याचे आजार व आयुर्वेदिय उपचार

अम्लपित्त कारणे आणि उपचार

तुमच्या मधुमेहामागे ‘स्ट्रेस’ हे तर कारण नाही ना?